SANGLI NEWS : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा तब्बल 301 मतांच्या फरकाने पराभव करत विधान परिषदेत प्रवेश निश्चित केला.
मतमोजणीनंतर एकूण 894 मतदानांपैकी 9 मते अवैध ठरली, तर 885 मते वैध ठरली. विजयासाठी आवश्यक कोटा 443 मतांचा होता. अंतिम निकालात धैर्यशील कदम यांना 593 मते मिळाली, तर अभयसिंह जगताप यांना 292 मतांवर समाधान मानावे लागले.
या निकालामुळे सांगली आणि सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महायुतीचे संख्याबळ आणि संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. निवडणुकीपूर्वी चुरशीची लढत होईल अशी चर्चा झाली असली तरी प्रत्यक्ष निकालात धैर्यशील कदम यांनी मोठी आघाडी घेत एकतर्फी विजय नोंदवला.
निकाल जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. मतमोजणी केंद्र परिसरात फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि घोषणाबाजी करण्यात आली. विजयाची बातमी समोर येताच समर्थकांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.
सांगली-सातारा मतदारसंघातील हा निकाल राज्याच्या राजकारणातही चर्चेचा विषय ठरला असून महायुतीने आपले वर्चस्व कायम राखल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.




