शिराळा | शिराळा तालुक्यातील ऊस पट्ट्यात बिबट्यांचा मुक्त संचार आणि वारंवार सापडणारी बिबट्याची पिले यामुळे शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंधरा दिवसांत चार वेगवेगळ्या घटनांमुळे तालुक्यातील ऊसतोड पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शनिवारी (दि. 6) कापरी (ता. शिराळा) येथे शिवाजी बाळा पाटील यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना पंधरा ते वीस दिवस वयाची बिबट्याची दोन पिले आढळून आली. ही माहिती मिळताच वनविभाग आणि सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पूर्वीही याच शेतात पिले सापडली होती
यापूर्वी बुधवारी (दि. 26) सकाळी याच शेतात ऊसतोड सुरू असताना बिबट्याची दोन पिले आढळली होती. त्यावेळी वनविभागाने तात्काळ ऊसतोड थांबवत तीन ट्रॅप कॅमेरे बसवले होते. पिले सुरक्षित ठेवण्यात आल्यानंतर अवघ्या दोन तासांत मादी बिबट तेथे येऊन पिले घेऊन गेली, हा संपूर्ण प्रकार ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला होता.
पुन्हा तीच घटना; परिसरात घबराट
मात्र शनिवारी पुन्हा तसाच प्रकार घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. बिबट्याच्या सततच्या हालचाली लक्षात घेता संपूर्ण परिसरातील ऊसतोड तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
प्राणिमित्र सुशीलकुमार गायकवाड यांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ वनाधिकारी अनिल वाजे आणि दत्तात्रय शिंदे यांना कळवले. त्यानंतर पथकाने घटनास्थळाची पाहणी करून ग्रामस्थ व मजुरांना सुरक्षित अंतरावर हलवले.
पिलांची काळजी; पुन्हा मादीशी भेट घडवण्याचा प्रयत्न
वनविभागाचे अधिकारी अनिल वाजे, दत्तात्रय शिंदे, सुशीलकुमार गायकवाड, धीरज गायकवाड आणि युनूस मणेर यांनी बिबट्याच्या पिलांना काळजीपूर्वक शिराळा येथील वनविभाग कार्यालयात आणले. दोन तासांच्या अंतराने दिवसभर पिलांना दूध पाजण्यात आले.
सायंकाळी पुन्हा एकदा मादी बिबट व पिलांची पुनर्भेट घडवून आणण्यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत. वनविभागाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



