सांगली: बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसच्या संभाव्य मार्गावरून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही भागांत नव्या वादाला सुरुवात झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी ही गाडी गुंटकल-कलबुर्गी-सोलापूर मार्गे धावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे सांगली, बेळगाव, धारवाड आणि हुबळी परिसरातील संघटना आक्रमक झाल्या आहेत.
माहितीनुसार, बंगळुरू येथे स्लीपर वंदे भारतची रॅक दाखल झाली असून जुलैच्या सुरुवातीला या सेवेचे उद्घाटन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र मार्गाबाबत अद्याप अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही.
दरम्यान, बंगळुरू-तुमकूर-धारवाड-बेळगाव-सांगली-पुणे हा मार्ग देखील पूर्णपणे दुपदरी आणि विद्युतीकरण करण्यात आला आहे. या रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी मोठी गुंतवणूक करण्यात आली असून दोन्ही मार्गांचे अंतर जवळपास समान असल्याचा दावा स्थानिक संघटनांकडून करण्यात येत आहे.
सांगली-बेळगाव पट्ट्यातील प्रवाशांचा आक्षेप असा आहे की, सोलापूरला आधीच मुंबईसाठी वंदे भारत सेवा उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत नवीन स्लीपर वंदे भारत देखील त्याच मार्गावर दिल्यास प्रादेशिक असमतोल निर्माण होईल. दुसरीकडे सांगली, बेळगाव, धारवाड आणि हुबळी या महत्त्वाच्या शहरांना अद्याप वंदे भारत सेवेचा लाभ मिळालेला नाही.
या मुद्द्यावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तसेच काही स्थानिक संघटनांनी राज्य सरकारकडे निवेदन दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही यासंदर्भात तक्रार करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
स्थानिक रेल्वे प्रवासी संघटनांच्या मते, भविष्यात मुंबईकडे धावणाऱ्या आणखी काही स्लीपर वंदे भारत गाड्यादेखील सोलापूर मार्गे गेल्यास पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील प्रवाशांवर अन्याय होऊ शकतो. त्यामुळे बेळगाव-सांगली मार्गाचा गांभीर्याने विचार करण्याची मागणी वाढत आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने अंतिम मार्ग जाहीर केलेला नसल्याने सर्वांचे लक्ष आता केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयाकडे लागले आहे. स्थानिक पातळीवरील वाढता दबाव पाहता अंतिम क्षणी मार्गात बदल होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.




