Maharashtra Sanskriti Bachao Andolan Sangli | सांगली : काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली, तसेच लोकनेते स्व. राजारामबापू पाटील यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याच्या निषेधार्थ सांगली येथे आज आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीत जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी मंत्री, आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सक्रिय सहभाग नोंदवत, महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती आणि सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी जनतेला जागरूक राहण्याचे आवाहन केले.
डॉ. कदम म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील अनेक दिवंगत नेत्यांनी महाराष्ट्रातील राजकारणात तसेच समाजकारणात महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, त्यांच्या स्मृतींना धक्का पोहोचवणाऱ्या वक्तव्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो. “महाराष्ट्र हा सहिष्णुता, सहकार्य आणि संस्कृती यांचा संगम आहे. या परंपरेला तडा जाऊ नये म्हणून प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.
डॉ. कदम यांनी राज्याच्या राजकारणात सुसंस्कृत संवादाचे महत्त्व अधोरेखित करताना, कोणत्याही नेत्याने वैयक्तिक टीका किंवा द्वेषपूर्ण वक्तव्ये करणे हा लोकशाहीला घातक प्रकार असल्याचे स्पष्ट केले.
या आंदोलनात राज्याचे माजी आरोग्य मंत्री मा. राजेश टोपे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे, खासदार निलेशजी लंके, आमदार मा. रोहितदादा पवार, आमदार मा. जितेंद्रजी आव्हाड, आमदार मा. रोहितदादा पाटील तसेच महाविकास आघाडीचे इतर नेते, पदाधिकारी, जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा: कोयनेतून विसर्ग वाढला, कृष्णेची पाणी पातळी वाढली; नदीकाठची शेती पुन्हा पाण्याखाली.



