सांगली : एका महिलेला मोबाईलवरून मेसेज केल्याच्या कारणातून पुण्यातील ५९ वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून त्यांना सांगलीत आणल्याचा आणि मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृतदेह कडेगाव तालुक्यातील टेंभू योजनेच्या कॅनॉलमध्ये टाकण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
मृत व्यक्तीचे नाव गोविंद माधवराव उपासे (वय ५९) असून ते पुण्यातील रहिवासी होते. ते बेपत्ता झाल्यानंतर पुण्यातील नांदेड सिटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, सांगली शहर पोलिसांना मिळालेल्या एका गोपनीय माहितीच्या आधारे या प्रकरणाचा तपास पुढे गेला.
पोलिसांच्या माहितीनुसार, १० ऑगस्ट रोजी आंबेगाव बुद्रुक परिसरातून उपासे यांना तिघांनी वाहनातून नेले. त्यानंतर त्यांना सांगलीतील शामरावनगर परिसरातील एका गोठ्यात आणण्यात आले. तेथे त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांना पुण्याच्या दिशेने घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला.
मृत्यू झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह कडेगाव परिसरातील टेंभू योजनेच्या कॅनॉलमध्ये टाकण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली.
गोपनीय माहितीने मिळाली तपासाला दिशा
सांगली शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील कर्मचारी गौतम कांबळे आणि संतोष गळवे यांना शामरावनगर परिसरात एका व्यक्तीला आणून मारहाण केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित माहितीची पडताळणी करत तपास सुरू केला.
चौकशीदरम्यान या प्रकरणाचा संबंध पुण्यातील बेपत्ता व्यक्तीशी असल्याचे समोर आले. पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करून संशयितांचा शोध घेतला.
या प्रकरणात वैभव ऊर्फ तातोबा केंगार (२८), रोहन जयसिंग सावंत (२३) आणि राहुल राजेंद्र बाबर (२५) या तिघांना ताब्यात घेण्यात आले.
सांगली शहर पोलिसांनी केलेल्या तपासानंतर खुनाचा गुन्हा कडेगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पुढील कायदेशीर कारवाईसाठी संशयितांना आंबेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या घटनेमागील नेमके कारण, आरोपींची भूमिका आणि संपूर्ण घटनाक्रमाचा पुढील तपास संबंधित पोलिसांकडून सुरू आहे.
हेही वाचा: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत.




