सांगली : येत्या दोन दिवसांत मुंबईत होणाऱ्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत सांगली जिल्हा परिषद सत्तास्थापनेचा अंतिम निर्णय होणार आहे. सोमवारी मिरजेतील शासकीय विश्रामधाम येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी अध्यक्षपदासाठी स्पष्ट आग्रह धरल्याने सांगलीतील राजकीय समीकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेत्यांमध्ये सत्तास्थापनेबाबत चर्चा झाली.
जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचे संख्याबळ ३० असून महाविकास आघाडीला बहुमतासाठी केवळ एका सदस्याची गरज आहे. दुसरीकडे भाजपकडे जनसुराज्य व रयत क्रांतीसह १८ सदस्य आहेत. स्पष्ट बहुमतासाठी महायुतीला अजून १३ सदस्यांची आवश्यकता आहे.
राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे ६ आणि शिवसेना (शिंदे गट) चे ७ सदस्य निवडून आल्याने हे दोन्ही गट सध्या ‘किंगमेकर’ भूमिकेत आहेत.
अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला संधी द्यावी, या मागणीवर घटक पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीनंतरच होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
अध्यक्षपद, उपाध्यक्षपद आणि सभापती पदांवर तडजोड होणार की एखादा गट वेगळी भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे मुंबईतील बैठक सांगलीच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे.
- बैलगाडी शर्यतीला गेलेल्या युवकाची मोटारसायकल चोरी; रेठरेधरण येथील घटना
- दिघंची बसस्थानकाजवळील दुकान फोडले; 1.21 लाखांचा ऐवज लंपास
- सांगली महानगरपालिका भरतीच्या नावाने फसवणूक? सोशल मीडियावरील जाहिराती खोट्या
- होळीच्या रात्री पुणे–बेंगलोर महामार्गावर हिट अँड रन; पेठनाक्याजवळ 55 वर्षीय वेटरचा मृत्यू
- इस्राईल-इराण तणाव; दुबईला गेलेल्या कुपवाडमधील 30–35 पर्यटकांशी संपर्क, सुरक्षिततेबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू
- सांगली मनपाच्या पहिल्या महासभेत मोठा निर्णय; 30 कोटींच्या नाट्यगृहाला मंजुरी, स्थायी समिती गठीत









