ईश्वरपूर (ता. वाळवा) : भारत आणि अमेरिकेदरम्यान झालेल्या नव्या अंतरिम व्यापार कराराबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार जयंत पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे. या करारामुळे भारतातील शेतकरी आणि शेती क्षेत्र अडचणीत येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी ईश्वरपूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आ. जयंत पाटील म्हणाले की, या करारामुळे अमेरिकेतील शेतमाल आणि दुग्धजन्य पदार्थ कमी दरात भारतात आले, तर देशातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहू शकते. आधीच अनेक अडचणींना सामोरे जाणारा भारतीय शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेती करणाऱ्या अमेरिकेतील शेतकऱ्यांशी स्पर्धा कशी करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
भारतातील शेतकऱ्यांकडे आधुनिक शेतीसाधनांचा अभाव आणि मर्यादित भांडवल असल्याचे सांगत, अशा परिस्थितीत परदेशी स्वस्त आयात शेतकऱ्यांसाठी घातक ठरू शकते, असे मत त्यांनी मांडले. दुग्धजन्य पदार्थ व शेतमाल कमी दरात आयात झाल्यास देशातील शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होईल आणि त्यामुळे शेतकरी संकटात येईल, अस ते म्हणाले.
या संपूर्ण करारावर संसदेत सविस्तर चर्चा व्हावी आणि सरकारने कराराबाबत अधिक स्पष्टता द्यावी, अशी मागणी आ. जयंत पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार, या अंतरिम भारत–अमेरिका व्यापार करारात भारतातील संवेदनशील कृषी व दुग्धजन्य उत्पादनांना संरक्षण देण्यात आले आहे. गहू, तांदूळ, मका, डाळी तसेच दूध, दही, तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थांवर कोणतीही सवलत देण्यात आलेली नसल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा: मिरज तालुक्यातील माधवनगरमध्ये मतदानावर बहिष्कार; मूलभूत सुविधाच नसल्याने नागरिकांचा निषेध.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










