Sangli News | सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात ‘मैत्रीपूर्ण लढत’ होऊ शकते, असे संकेत दिल्यानंतर महायुतीतील अंतर्गत तणाव उघडपणे समोर येऊ लागला आहे.
आतापर्यंत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र अजित पवार गटाने स्वतंत्र राजकीय भूमिका घेतल्यास सांगली महापालिका निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे भाजपसमोरही नव्या प्रकारचे आव्हान उभे राहणार आहे.
भाजपने निवडणुकीची तयारी आधीच सुरू केली असून इच्छुकांच्या मुलाखती, संघटनात्मक बैठका आणि रणनीती आखण्यावर भर दिला आहे. मात्र युतीत असतानाही भाजप आणि अजित पवार गटात जागावाटपावरून नाराजी होती, ती आता स्पष्टपणे जाणवू लागली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार गट स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याच्या हालचाली करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे एका बाजूला मविआ, दुसऱ्या बाजूला भाजप आणि तिसऱ्या बाजूला अजित पवार गट अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
या तिरंगी राजकारणात अजित पवार गटाची भूमिका निर्णायक ठरणार असून, त्यांच्या निर्णयावर सांगली–मिरज–कुपवाड महापालिकेतील सत्तासमीकरण अवलंबून राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यंदाची महापालिका निवडणूक केवळ पक्षीय नव्हे, तर राजकीय रणनीतींची कसोटी ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
हेही वाचा: सांगलीत काँग्रेसचा तिढा वाढतोय? जयंत पाटील–मंगेश चव्हाण भेटीने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










