सांगली : सांगली–मिरज हे पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख वैद्यकीय केंद्र म्हणून ओळखले जाते. सांगली–मिरज शहरासह ग्रामीण भाग, कर्नाटक, कोकण तसेच महाराष्ट्राबाहेरील अनेक रुग्ण उपचारासाठी येथील रुग्णालयांवर अवलंबून आहेत. मात्र प्रत्यक्षात रात्रीच्या वेळेस, विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत, काही खासगी रुग्णालयांमधील सेवा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे समोर येत आहे.
एका स्थानिक नागरिकाच्या प्रत्यक्ष अनुभवातून ही बाब समोर आली आहे. संबंधित नागरिकाने सांगितले की, सांगलीतील एका नामांकित खासगी प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ रुग्णालयात रात्री १२ नंतर तातडीच्या गरजेने त्याने वारंवार फोन केला. फोनला रिंग होत होती, मात्र अनेक प्रयत्नांनंतरही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परिस्थिती गंभीर असल्याने नागरिक स्वतः काही मिनिटांत रुग्णालयात पोहोचला.
रुग्णालयाच्या परिसरात प्रवेश मिळाल्यानंतरही मुख्य दरवाजा आतून बंद होता. काचेआड कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसत असूनही, बेल वाजवून तसेच हाका मारूनही दीर्घकाळ कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दुसऱ्या दरवाजावर पुन्हा बेल वाजवल्यानंतर एका कर्मचाऱ्याने प्रतिसाद दिला. त्यानंतर डॉक्टरांशी संपर्क साधून औषधोपचाराची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
या अनुभवातून नागरिकाने व्यक्त केलेली भावना अशी की,
“डॉक्टर उपलब्ध असतात, मात्र रात्रीच्या वेळेस रुग्णालयात नेमलेले कर्मचारी फोन उचलत नाहीत, बेल वाजवल्यानंतर किंवा हाका मारल्यानंतरही वेळेवर प्रतिसाद देत नाहीत. आपत्कालीन परिस्थितीत असा विलंब रुग्णाच्या जीवावर बेतू शकतो.”
ही केवळ एक घटना नाही, तर व्यापक समस्या?
नागरिकांचे म्हणणे आहे की, अशी परिस्थिती केवळ एका रुग्णालयापुरती मर्यादित नसून सांगली–मिरज परिसरातील अनेक मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये रात्रीच्या वेळेस अशाच प्रकारच्या तक्रारी ऐकायला मिळतात. गंभीर रुग्ण, गर्भवती महिला किंवा तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांसाठी वेळेवर प्रतिसाद न मिळाल्यास परिस्थिती अधिकच धोकादायक ठरू शकते.
तणाव आणि वादाची शक्यता
रुग्णांचे नातेवाईक आधीच मानसिक तणावात असतात. अशा वेळी प्रतिसाद न मिळाल्याने संताप, गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. यापूर्वी अशा कारणांमुळे रुग्णालय परिसरात वाद, गोंधळ तर काही वेळा हाणामारीच्या घटना घडल्याचेही समोर आले आहे.
प्रशासन व आरोग्य यंत्रणेकडून अपेक्षा
आरोग्य सेवा ही केवळ इमारत, उपकरणे आणि डॉक्टरांपुरती मर्यादित नसून, ती २४ तास तत्परपणे कार्यरत राहणे आवश्यक आहे. विशेषतः सांगली–मिरजसारख्या वैद्यकीय केंद्रात रात्रीच्या आपत्कालीन व्यवस्थेची नियमित तपासणी, कर्मचारी प्रशिक्षण, प्रतिसाद वेळ (response time) आणि तक्रार निवारण यंत्रणा प्रभावीपणे राबवली जाणे गरजेचे असल्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
ही बातमी कोणत्याही एका रुग्णालयावर थेट आरोप करण्यासाठी नसून, रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवर लक्ष वेधणारी आहे.
हेही वाचा: सन 2026 साठी सांगली जिल्ह्यातील स्थानिक सुट्ट्या जाहीर.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










