सांगली : भारताची जनगणना 2027 प्रक्रिया 16 मे 2026 पासून सुरू होत असून पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणना करण्यात येणार आहे. ही कार्यवाही 14 जून 2026 पर्यंत चालणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी दिली.
जनगणनेचा पहिला टप्पा ‘घरयादी व घरगणना’ असा असून नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना अचूक व परिपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या मोहिमेसाठी जिल्ह्यात 21 चार्ज स्तरांवर 4 हजार 421 प्रगणक आणि 791 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच 23 एप्रिल ते 8 मेदरम्यान त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले.
16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक गावागावात जाऊन प्रत्यक्ष घरगणना करणार आहेत. यावेळी घराची स्थिती, कुटुंबातील सदस्य, उपलब्ध सुविधा, मालमत्ता आणि इतर माहितीबाबत एकूण 34 प्रश्न विचारले जाणार आहेत.
ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने HLO ॲपद्वारे पार पडणार असून नागरिकांच्या माहितीची गोपनीयता सुरक्षित ठेवली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा: कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी.




