ईश्वरपूर: NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ ईश्वरपूर येथे विद्यार्थी, विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था आणि समविचारी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी निषेध मोर्चा काढत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नसल्याचा इशारा दिला.
दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा आणि जंतर-मंतर येथे आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ पंचायत समिती परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निघालेला मोर्चा झरीनाका, आझाद चौक, गांधी चौक आणि यल्लमा चौक मार्गे तहसील कार्यालयात पोहोचला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी, शिक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागणे ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब असल्याचे सांगत परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्याची मागणी केली. तसेच NEET पेपरफुटीप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान काही वक्त्यांनी केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणांवर टीका केली. विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी शिक्षण व्यवस्था, परीक्षा प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर आपली भूमिका मांडली.
या आंदोलनात विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन शांततेत पार पडले असून परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.




