विटा (जि. सांगली) : खानापूर तालुक्यातील आळसंद येथे आरफळ कालव्यात पडून सहा वर्षांच्या बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राजवीर सोमनाथ जाधव (वय ६, रा. आळसंद) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना १५ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली.
राजवीर हा विटा–कुंडल रस्त्यावरील आरफळ कालव्यावरील पुलावर पाणी पाहत असताना अचानक तोल जाऊन कालव्यात पडला. कालव्यातील पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने काही क्षणांतच तो पाण्यात दिसेनासा झाला. ही घटना तेथून जाणाऱ्या काही महिलांनी पाहिली. त्यांनी आरडाओरड केली; मात्र त्या वेळी मदतीसाठी कोणीही पुरुष उपस्थित नसल्याने तातडीने बचाव करता आला नाही.
घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी आरफळ कालव्याच्या काठावर गर्दी केली. काही ग्रामस्थांनी पाण्यात उतरून शोधमोहीम सुरू केली. मात्र अनेक तास प्रयत्न करूनही यश आले नाही. अखेर घटनेच्या ठिकाणापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर कालव्यात राजवीरचा मृतदेह आढळून आला.
राजवीर हा जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीत शिकत होता. तो अभ्यासात हुशार, शांत स्वभावाचा आणि शिक्षकांचा लाडका विद्यार्थी होता. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण आळसंद गावात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा: सांगली–मिरज–कुपवाड महापालिकेत भाजप सर्वाधिक जागांवर विजयी; प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची यादी.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









