सांगली : जिल्ह्याच्या दीर्घकालीन विकास नियोजनाच्या पार्श्वभूमीवर सागरेश्वर अभयारण्य येथे पर्यटन विकासासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या आहेत. अभयारण्य परिसरातील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीत वन विभाग, नियोजन विभाग तसेच महसूल व पंचायत राज यंत्रणेशी संबंधित अधिकारी उपस्थित होते. अभयारण्याच्या पर्यटन क्षमतेचा अभ्यास करून नियोजनबद्ध पद्धतीने विकास करण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. पर्यटन विकासासोबतच स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेच्या संधी वाढविण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करावा, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देता येऊ शकते, असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटन आराखड्यात कृषि पर्यटन, कौशल्यविकास प्रशिक्षण तसेच स्थानिक रोजगारनिर्मिती यांचा समावेश करण्याचे निर्देश दिले. सन 2030 पर्यंत जिल्ह्याच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी नियोजनबद्ध दृष्टीकोन ठेवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
सागरेश्वर अभयारण्य हे मानव-निर्मित असून जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण असल्याचे प्रशासनाकडून नमूद करण्यात आले. या परिसरात विविध वन्यप्राणी व नैसर्गिक अधिवास आढळतात. या पार्श्वभूमीवर राज्यातील तसेच जिल्ह्यातील पर्यटकांनी अभयारण्याला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.
या पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अभयारण्य परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यासोबतच प्रशासन आणि स्थानिक घटकांमध्ये संवाद साधून पुढील नियोजनाबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली.
दरम्यान, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मस्थळी भेट दिली, तसेच त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
हेही वाचा: चौथी व सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा 26 एप्रिल रोजी; परीक्षा परिषदेकडून अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










