सांगली : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या जनजागृतीसाठी सांगली जिल्ह्यात सिने व दूरचित्रवाणी क्षेत्रातील कलाकारांचा सहभाग घेण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत अभिनेते संदीप पाठक आणि ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परब हे शुक्रवारी (दि. 9) जिल्ह्यातील काही गावांना भेट देणार आहेत, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी वाळवा तालुक्यातील येडनिपाणी, दुपारी पलूस तालुक्यातील सांडगेवाडी, तर त्यानंतर खानापूर–विटा तालुक्यातील आळसंद येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये हे कलाकार सहभागी होणार आहेत. या भेटीदरम्यान ग्रामस्थांशी थेट संवाद साधत अभियानाची उद्दिष्टे, ग्रामपंचायतींची भूमिका, लोकसहभागाचे महत्त्व तसेच शाश्वत विकासाशी संबंधित बाबी मांडल्या जाणार आहेत.
सिने कलाकारांविषयी ग्रामीण भागात असलेले प्रेम लक्षात घेता, त्यांच्या सहभागातून अभियानाबाबतची माहिती अधिक प्रभावीपणे पोहोचवता येईल, असा प्रशासनाचा उद्देश आहे. संवाद आणि सादरीकरणाच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये सकारात्मक जनजागृती करण्यावर या कार्यक्रमांमध्ये भर दिला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आणि प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पंचायतराज अभियानाची अंमलबजावणी सुरू असून, कलाकारांच्या या दौऱ्यामुळे अभियानाच्या प्रचार-प्रसाराला चालना मिळेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
या जनजागृती कार्यक्रमांमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: सांगलीसह महाराष्ट्रातील पर्यटकांनी सागरेश्वर अभयारण्याला भेट द्यावी – जिल्हाधिकारी अशोक काकडे.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










