सांगली : सांगली शहरात अवघ्या ३० रुपयांच्या माव्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा चाकूहल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत तरुणाचे नाव नारायण सुरेश पवार (वय २८, रा. वडर गल्ली, सांगली) असे आहे. रविवारी शहरातील एका पानटपरीवर मावा देण्याच्या कारणावरून नारायण पवार याचा काही तरुणांशी वाद झाला होता. या वादातून संशयितांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या नारायण पवार याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता.
दरम्यान, अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी नारायण पवार याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर पोलिसांनी गुन्ह्याचे स्वरूप बदलून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील संशयित हे परस्पर नातलग असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










