सांगली : सांगली शहरातील अहिल्यानगर परिसरात पूर्व वैमनस्यातून एका तरुणाची कोयत्याने हत्या झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. विनायक ऊर्फ राहुल कदम (रा. सांगली) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत राहुल कदम आणि संशयित आरोपी यांच्यात सुमारे आठ दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून शुक्रवारी दुपारी संशयितांनी राहुलवर हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
शुक्रवारी दुपारी राहुल कदम अहिल्यानगर परिसरातील महावितरण कार्यालयासमोर थांबलेला असताना चार संशयित तेथे आले. जुन्या वादाचा जाब विचारत त्यांनी अचानक कोयत्याने हल्ला चढवला. डोक्यावर व चेहऱ्यावर वर्मी घाव बसल्याने राहुल गंभीर जखमी झाला.
हल्ल्यानंतर स्थानिकांनी त्याला तातडीने सांगलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच सायंकाळी त्याचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी घोषित केले.
घटनेनंतर चारही संशयित आरोपी स्वतःहून संजयनगर पोलीस ठाण्यात हजर झाले. पूर्व वैमनस्यातूनच हा खून झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला असून, पुढील तपास सुरू आहे. कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक आनंद घाटगे यांनी दिली.
हेही वाचा: मेंदूमृत रुग्णाच्या अवयवदानातून तिघांना जीवनदान; हरिपूरचे दीपक धर्माधिकारी मृत्यूनंतरही अवयवरूपी जिवंत.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










