Sangli News | पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी (Fair and Remunerative Price) थकीत ठेवण्यात आल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ऊस तोडीनंतर १४ दिवसांत देय असलेली एफआरपी रक्कम अनेक साखर कारखान्यांनी अद्याप अदा न केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे येथे राज्याचे साखर आयुक्त संजय कोलते यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राजू शेट्टी यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. एफआरपी थकवणाऱ्या साखर कारखान्यांवर आर.आर.सी. (Recovery of Revenue Certificate) अंतर्गत कारवाई करून थकीत रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
शेट्टी यांनी सांगितले की, गळीत हंगाम 2022-23 ते 2024-25 या कालावधीत शेतकऱ्यांची एफआरपी थकीत असून ती १५ टक्के व्याजासह अदा करण्यात यावी. तसेच गळीत हंगाम 2025-26 मध्ये ५०० टनांपेक्षा अधिक ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची गावनिहाय यादी प्रसिद्ध करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, साखर कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणावर ऊस तोडणी-वाहतुकीचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांवर टाकला जात असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. २५ किलोमीटरपर्यंत प्रतिटन ७५० रुपये तोडणी-वाहतूक दर निश्चित करून, त्यापेक्षा जास्त अंतराचा खर्च कारखान्यांनी स्वतः उचलावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
रिकव्हरी चोरी आणि काटामारीच्या तक्रारी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक साखर कारखान्यावर शासकीय डिजिटल वजनकाटे बसवून ते ऑनलाईन प्रणालीशी जोडावेत, अशी सूचना शेट्टी यांनी केली. तसेच सर्व साखर कारखान्यांचे मोलसिस टाकी (Molasses Tank) सीसीटीव्हीच्या निगराणीत ठेवून संबंधित यंत्रणांकडून २४ तास नियंत्रण ठेवण्यात यावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपीचा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही या बैठकीदरम्यान देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा: हळदीच्या वायदेबाजारातील गैरव्यवहाराची CBI चौकशी करा; राजू शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










