Sangli News | सांगली : हळदीच्या वायदेबाजाराच्या माध्यमातून मुठभर व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत असल्याचा गंभीर आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी या प्रकरणाची CBI मार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राजू शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १० वर्षांत वायदेबाजाराचा गैरवापर करून हळदीचे दर कृत्रिमरित्या पाडले गेले, ज्यामुळे देशभरातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचे २५ हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सांगलीसह हळद उत्पादक जिल्हे सर्वाधिक प्रभावित
राज्यात सांगली, हिंगोली, नांदेड, परभणी, चंद्रपूर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि वाशिम हे हळद उत्पादनाचे प्रमुख जिल्हे आहेत. देशात सर्वाधिक हळद उत्पादन करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख असून, राज्यात दरवर्षी सुमारे ३ ते ३.५ लाख टन हळदीचे उत्पादन होते. यावर्षी उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची शक्यता असताना, बाजारात भाव वाढण्याऐवजी वायदेबाजारात दर पाडले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
स्थानिक बाजार व वायदेबाजारातील दरांमध्ये तफावत
राजू शेट्टी यांनी नमूद केले की,
स्थानिक बाजारात हळदीचे दर चांगले असतानाही NCDEX वरील वायदेबाजारात कृत्रिमरित्या कमी दर दाखवले जात आहेत. वायदेबाजारात खरेदी करण्यात आलेल्या हळदीची गुणवत्ता, दर्जा आणि गोदामांतील प्रत्यक्ष स्थिती तपासल्यास, ठरवलेल्या मापदंडांमध्ये मोठी तफावत आढळते, असा आरोप त्यांनी केला आहे.
साखरेप्रमाणे हळद वायदेबाजारातून मुक्त करण्याची मागणी
शेट्टी यांनी यापूर्वी साखरेला वायदेबाजारातून मुक्त केल्याचा दाखला देत सांगितले की, त्या निर्णयामुळे साखरेचे दर स्थिर राहिले आणि शेतकरी व ग्राहक दोघांनाही फायदा झाला.
हळदही वायदेबाजारातून वगळल्यास शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणात राज्य सरकार आणि केंद्र सरकारने गंभीर दखल घ्यावी व हळद बाजारातील संभाव्य गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
हेही वाचा: सांगली जिल्ह्यात खुनाच्या दोन घटना; शहरात जुन्या वादातून हत्या, तर जतमध्ये संशयास्पद मृत्यू.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










