ईश्वरपूर : वाळवा तालुक्यातील पेठ येथे महामार्गावरील पुलावर गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीवर मागे बसलेले धनाजी तुकाराम थोरात (वय 37, रा. ओंड, ता. कराड) हे रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला.
जखमी शशांक राजाराम सुतार (वय 40) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोघेही गुरुवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास महामार्गावरून दुचाकीने (क्र. MH 05 AT 5764) प्रवास करत होते. त्याचवेळी मागून आलेल्या ट्रकने (क्र. MH 11 CH 7001) पुलावर त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक लागल्याने धनाजी थोरात यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. शशांक सुतार यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांना ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक वाहन सोडून घटनास्थळावरून फरार झाला. ईश्वरपूर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: नोकरीच्या आमिषाने सव्वा लाखाची फसवणूक, दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.



