शिराळा तालुक्यातील या गावात बिबट्याचा हल्ला; तीन शेळ्या व बोकड मृत्युमुखी, उपाययोजनांची मागणी

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
फोटो : प्रतिकात्मक

शिराळा : शिराळा तालुक्यातील औंढी (ता. शिराळा) येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी बबन पाटील यांच्या मालकीच्या तीन शेळ्या व एक बोकड ठार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवार, दि. 26 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बबन पाटील यांनी आपल्या शेतात उभारलेल्या शेडमध्ये शेळ्या व बोकड बांधले होते. रात्रीच्या वेळेत बिबट्याने शेडमध्ये प्रवेश करून पशुधनावर हल्ला केला. सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर संबंधित घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच वनपाल अनिल वाजे आणि वनरक्षक दत्तात्रय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.

दरम्यान, शिराळा तालुक्यातील उत्तर भागात बिबट्यांचा वावर वाढल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. पाडळी, पाडळीवाडी, खेड बेलदारवाडी, भटवाडी, निगडी, शिरशी, गिरजवडे, करमाळे, औंढी तसेच एमआयडीसी परिसरात बिबट्यांचे वारंवार दर्शन होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. ऊसतोड सुरू असल्याने शेतातील फड मोकळे होत असून, त्यामुळे वन्यप्राणी नागरी वस्तीच्या दिशेने येत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

पंधरा दिवसांपूर्वी शिवरवाडी परिसरात मादी जातीचा बिबट्या ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे जेरबंद करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही परिसरात बिबट्यांचा वावर कायम असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

बिबट्यांचे हल्ले टाळण्यासाठी वन विभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, तसेच नागरी वस्तीकडे येणारे वन्यप्राणी रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा: सांगली महापालिका निवडणूक : महायुतीच गणित चुकतय का? राष्ट्रवादी बाहेर, शिंदेसेनेबाबत सस्पेन्स.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा