सांगली : मराठी भाषेतील उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२५ साठी प्रवेशिका व पुस्तके ३० जानेवारी २०२६ पर्यंत स्वीकारली जाणार आहेत. प्रकाशन वर्ष २०२५ मध्ये प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या पुरस्कारासाठी पात्र असणार आहेत.
या पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेली पुस्तके विचारात घेतली जाणार आहेत. लेखक तसेच प्रकाशक या दोघांनाही या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे.
मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळता अन्य जिल्ह्यातील लेखक व प्रकाशकांनी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) प्रवेशिका व पुस्तके सादर करावीत. मुंबई शहर व उपनगरातील लेखक व प्रकाशकांनी दोन प्रतींसह प्रवेशिका महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, प्रभादेवी, मुंबई येथे पाठवाव्यात.
या पुरस्काराची नियमावली व प्रवेशिका महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या sahitya.marathi.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. प्रवेशिका पूर्ण भरून आवश्यक साहित्यासह १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत संबंधित कार्यालयात पोहोचतील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवेशिका व पुस्तके पाठविताना बंद लिफाफ्यावर “स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२५ साठी प्रवेशिका” असा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. विहित कालमर्यादेनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा: सांगली-धामणी रस्ता वाहतुकीसाठी बंद; वापरा ‘हे’ पर्यायी वाहतूक मार्ग.
- इराण-इस्रायल तणावामुळे तेल दर वाढणार? सांगलीत पेट्रोल 104.07 रुपये; सध्या दरवाढ नाही
- विटा-कराड मार्गावर भीषण अपघात; जखमी महिलेचा 10 दिवसांनी मृत्यू
- सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड 13 मार्चला; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
- सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ‘हजारो मासे मृत, 5 लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका’
- कवठेमहांकाळमध्ये 2.88 किलो गांजा जप्त; तस्कर अटकेत
- सांगलीत ‘आमदार केसरी 2026’ भव्य बैलगाडी शर्यत; विजेत्यास 1 लाखांचे बक्षीस









