Sangli News | सांगली : संविधान दिनाच्या दिवशी घडलेली ही घटना केवळ प्रशासकीय यशाची नाही, तर माणुसकी जिवंत असल्याचा ठोस पुरावा ठरली आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून बेपत्ता असलेल्या बार्शी (जि. सोलापूर) येथील विजयाबाई रघुनाथ जाधव या वृद्ध आजीबाई अखेर आपल्या कुटुंबात सुखरूप परतल्या असून, या घरवापसीमागे जिल्हा परिषद सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासक IAS श्री. विशाल सविता तेजराव नरवाडे यांचा निर्णायक पुढाकार ठरला आहे.
विजयाबाई आजीबाई तब्बल २००० किलोमीटर दूर ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यातील एका वृद्धाश्रमात सापडल्या होत्या. कोणतेही ओळखपत्र, मोबाईल किंवा कुटुंबाचा संपर्क नसलेल्या या आजीबाई अपघाताने इतक्या दूर पोहोचल्या होत्या. झारसुगुडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी IAS कुणाल चव्हाण यांनी क्षेत्रभेटीदरम्यान NGO ‘विकास’ संचलित वृद्धाश्रमात त्यांना पाहिले.
ही माहिती मिळताच IAS विशाल नरवाडे यांनी स्वतः वैयक्तिक जबाबदारी स्वीकारत आजीबाईंना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला. आजीबाईंचा व्हिडिओ तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आला आणि नागरिकांना तो मोठ्या प्रमाणावर शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले.
त्याचा परिणाम लवकरच दिसून आला. ६ डिसेंबर २०२५ रोजी बार्शी येथील नातेवाईकांशी संपर्क झाला. “आम्ही आजीबाईंना दोन वर्षांपासून शोधत होतो,” अशी भावनिक प्रतिक्रिया कुटुंबीयांनी व्यक्त केली.
यानंतर ओडिशातील वृद्धाश्रमाशी समन्वय साधून आजीबाई व एका कर्मचारीसाठी रेल्वे प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. या संपूर्ण प्रवासाचा खर्चही IAS नरवाडे यांनी स्वतः उचलला. अखेर १० डिसेंबर २०२५ – आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनी, विजयाबाई आजीबाई आपल्या कुटुंबात सुखरूप परतल्या.
ही घटना म्हणजे करुण प्रशासनाचे जिवंत उदाहरण ठरली आहे. संवेदनशील, सहृदय आणि जबाबदार लोकसेवेच्या माध्यमातून दुर्लक्षित घटकांचे मानवी हक्क कसे जपले जाऊ शकतात, याचा हा आदर्श आहे.
या मानवी कार्याची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग, मुंबई यांच्यासह विविध सामाजिक घटक, वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी कौतुक केले आहे.
खऱ्या अर्थाने हा मानवाधिकार दिन एका हरवलेल्या वृद्धेच्या आयुष्यात आशेचा प्रकाश आणणारा ठरला, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
हेही वाचा: दिव्यांग व्यक्तींच्या छळाविरोधात कठोर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांना थेट अधिकार, SOP लागू.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










