सांगली : कर्नाटकातील प्रसिद्ध चिंचणी मायाक्का देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे मतदान पुढे ढकलले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवला असून, अंतिम निर्णय आयोगाच्या स्तरावर घेतला जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. मात्र, हाच दिवस मायाक्का देवी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील लाखो भाविक कर्नाटकातील चिंचली येथे दर्शनासाठी जातात. यात्रेच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर मतदार गावाबाहेर असण्याची शक्यता असून, त्यामुळे मतदानाची टक्केवारी घटू शकते, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी मतदान दिनांक पुढे ढकलण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्याची दखल घेत आयोगाने सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्व तालुक्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निर्णय अधिकाऱ्यांचे अहवाल मागवले होते. हे अहवाल आयोगाकडे पाठवण्यात आले असून, मतदान ८ फेब्रुवारी रोजी घेण्याचा पर्यायही विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
पूर्वीच्या वेळापत्रकानुसार १२ जिल्ह्यांमध्ये ५ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार होती. सांगली जिल्ह्यात मतदान पुढे ढकलल्यास मतमोजणीच्या तारखांवरही परिणाम होण्याची शक्यता असून, त्याचा इतर जिल्ह्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होऊ शकतो.
दरम्यान, याच मुद्द्यावर यापूर्वीही आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे अधिकृत निवेदन सादर करून मतदान दिनांकाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली होती. मायाक्का देवी यात्रेच्या मुख्य दिवशी मतदान झाल्यास मोठ्या प्रमाणावर मतदार गैरहजर राहू शकतात, असा मुद्दा पडळकर यांनी आयोगाच्या निदर्शनास आणून दिला होता.
सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे निवडणूक आयोग पुढील निर्णय घेणार असून, मतदानाच्या तारखेत बदल होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित समीर गायकवाडचा सांगलीत मृत्यू.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










