सांगली : शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा तसेच शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांना सौजन्याची वागणूक मिळावी, यासाठी प्रत्येक स्तरावरील अधिकाऱ्यांनी लोकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात व त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.
ते वाळवा (ईश्वरपूर) तहसिलदार कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात वाळवा तालुक्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील नागरिकांना जात प्रमाणपत्रांचे वितरण तसेच लक्ष्मी मुक्ती योजना अंतर्गत लाभार्थ्यांना ७/१२ उताऱ्यांचे वाटप डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, ईश्वरपूर उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसिलदार सारिका रासकर, आष्टा अपर तहसिलदार राजशेखर लिंबारे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, तसेच उरूण ईश्वरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले की, शासन समाजातील प्रत्येक घटकासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत पतीच्या संमतीने सातबारा उताऱ्यावर पत्नीचे नाव नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सातबारा उतारा अनेक शासकीय प्रक्रियांमध्ये आवश्यक असल्याने त्यावर दोघांची नावे असल्यास नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास मदतीची रक्कम संयुक्त खात्यात जमा होण्यास मदत होते आणि कुटुंबीय वाद टाळता येतात.
मात्र, आई-वडील हयात असताना सातबारावर त्यांचे नाव कायम ठेवण्याची दक्षता घ्यावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तसेच जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या विविध लोकाभिमुख उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
हेही याचा: मिरज भुयारी गटारी कामासाठी दोन महिने वाहतूक बदल; 24 डिसेंबर ते 24 फेब्रुवारी 2026 दरम्यान प्रमुख रस्ता बंद.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









