सांगली (प्रतिनिधी): मिरज तालुक्यातील अंकली परिसरात झालेल्या अपघातात दुचाकीवरून पडलेल्या महिलेचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना शनिवार, 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
मृत महिलेचे नाव शेवंता वसंत कज्जे (वय 65, रा. लक्ष्मीनगर, मिरज) असे असून, त्यांचे पती वसंत कज्जे हे गंभीर जखमी झाले आहेत. हे दांपत्य निमशिरगाव येथून मिरजेकडे दुचाकीवरून परतत असताना अंकलीजवळ त्यांच्या दुचाकीचा ताबा सुटला. दुचाकी घसरून दोघे रस्त्यावर पडले.
दरम्यान, मागून येणाऱ्या ट्रकच चाक शेवंता कज्जे यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वसंत कज्जे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
या अपघाताबाबत अशोक वसंत कज्जे यांनी ट्रकचालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.



