सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असून फेब्रुवारीअखेरीस बहुतांश कारखाने बंद होण्याची शक्यता आहे. हंगाम कमी दिवसांत आटोपत असल्याने उर्वरित उसाचे नियोजन आणि थकबाकीवर शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी १२ फेब्रुवारीपर्यंत एकूण ७६ लाख ६ हजार ४५४ टन ऊस गाळप करून ८० लाख २७ हजार ८४७ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. १०.४८ टक्के सरासरी साखर उतारा नोंदवला गेला आहे.
उताऱ्यात राजारामबापू पाटील यांचे वाटेगाव युनिट १२.५३ टक्क्यांसह आघाडीवर आहे, तर ऊस गाळपाच्या प्रमाणात सोनहिरा साखर कारखाना (सुमारे ९.३९ लाख टन) पुढे आहे.
काही कारखान्यांनी बंद करण्याच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. वाटेगाव युनिट ८ फेब्रुवारीला बंद झाले असून, साखराळे, कारंदवाडी आणि जत युनिट १७ फेब्रुवारीपर्यंत गाळप थांबवणार असल्याची माहिती आहे. ‘क्रांती’ कुंडल १६ फेब्रुवारीला, तर सोनहिरा कारखाना २० फेब्रुवारीच्या आसपास गाळप पूर्ण करणार आहे.
यंदा अनेक कारखान्यांचा हंगाम १०२ ते १११ दिवसांत आटोपला आहे. पूर्वी १५० दिवस चालणारा गाळप हंगाम गेल्या काही वर्षांत १२० दिवसांवर आला आहे. यंदा त्यापेक्षाही कमी कालावधीत गाळप संपत असल्याने पुढील वर्षी हंगाम आणखी कमी दिवसांचा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आता उर्वरित उसाची तोड, आणि देयकांच्या प्रक्रियेवर आहे.
हेही वाचा: कवलापूर विमानतळाचा मुहूर्त जवळ? केंद्राची टीम पाहणीला, जिल्ह्यात उत्सुकता वाढली.
- बैलगाडी शर्यतीला गेलेल्या युवकाची मोटारसायकल चोरी; रेठरेधरण येथील घटना
- दिघंची बसस्थानकाजवळील दुकान फोडले; 1.21 लाखांचा ऐवज लंपास
- सांगली महानगरपालिका भरतीच्या नावाने फसवणूक? सोशल मीडियावरील जाहिराती खोट्या
- होळीच्या रात्री पुणे–बेंगलोर महामार्गावर हिट अँड रन; पेठनाक्याजवळ 55 वर्षीय वेटरचा मृत्यू
- इस्राईल-इराण तणाव; दुबईला गेलेल्या कुपवाडमधील 30–35 पर्यटकांशी संपर्क, सुरक्षिततेबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू
- सांगली मनपाच्या पहिल्या महासभेत मोठा निर्णय; 30 कोटींच्या नाट्यगृहाला मंजुरी, स्थायी समिती गठीत









