Sugarcane FRP For 2025–26 in Maharashtra | मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत राज्यातील ऊस गाळप हंगाम 2025–26 सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यंदाचा गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून ऊस शेतकऱ्यांसाठी प्रति मेट्रिक टन ₹3550 इतकी एफआरपी (Fair and Remunerative Price) निश्चित करण्यात आली आहे. बेसिक उतारा 10.25 टक्के ठेवण्यात आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या गाळप हंगामात शेतकऱ्यांना योग्य भाव आणि दिलासा मिळावा यासाठी सरकारने ठोस निर्णय घेतला आहे.
गेल्या हंगामात राज्यातील 200 साखर कारखान्यांनी गाळपात भाग घेतला होता. यात 99 सहकारी आणि 101 खासगी कारखान्यांचा समावेश होता. एकूण ₹31,301 कोटींची एफआरपी शेतकऱ्यांना अदा करण्यात आली होती. त्यापैकी 99.06% एफआरपी देण्यात आली असून, 148 कारखान्यांनी शेतकऱ्यांना शंभर टक्के एफआरपी दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
तसेच सहवीज निर्मिती प्रकल्पांतर्गत 2024–25 मध्ये 298 कोटी युनिट्स वीज निर्यात करून ₹1979 कोटींचे उत्पन्न झाले. तर इथेनॉल विक्रीतून कारखान्यांना तब्बल ₹6378 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.
बैठकीत ऊस तोडणीसाठी यांत्रिकीकरण वाढवणे, सहवीज निर्मिती आणि इथेनॉल उत्पादनाला गती देणे याबाबतही सविस्तर चर्चा झाली.
हेही वाचा: वारणा, कोयना धरण परिसरात भूकंप.