Sangli Accident : पेठ येथील सेप्टिक टँक दुर्घटनेतील पाच जखमींची प्रकृती स्थिर; तिघांवर अंत्यसंस्कार

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
फोटो : प्रातिनिधिक छायाचित्र

ईश्वरपूर (ता. वाळवा) : पेठ परिसरात महामार्गालगत असलेल्या एका खासगी कंपनीत सेप्टिक टँकची साफसफाई करताना झालेल्या भीषण दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या पाच जणांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून, सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या घटनेत जखमी झालेल्या विशाल मारुती चौगुले (२४, ईश्वरपूर), केशव आनंदा साळुंखे (४५, निगडी, ता. शिराळा), हेमंत शंकर धनवडे (२७, ओझर्डे, ता. वाळवा) आणि सुनील आनंदा पवार (२९, रेठरे धरण, ता. वाळवा) यांच्यावर ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

तर महादेव रामचंद्र कदम (४०, महादेववाडी) यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

या दुर्घटनेत विशाल सुभाष जाधव (२६), सचिन तानाजी चव्हाण (३९) (दोघे रा. बेघर वसाहत, ईश्वरपूर) आणि सागर रंगराव माळी (३३, गोळेवाडी, पेठ) यांचा मृत्यू झाला होता. सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पेठ येथील एका खासगी कंपनीच्या आवारात सेप्टिक टँकची साफसफाई सुरू होती. सुमारे आठ फूट खोल असलेल्या टाकीत खासगी ठेकेदाराकडील कामगार शिडीच्या सहाय्याने उतरून मैला बाहेर काढत होते. टाकीत साचलेल्या विषारी वायूमुळे आणि प्राणवायूच्या कमतरतेमुळे एकामागून एक कामगारांना चक्कर येऊन ते टाकीत कोसळले. मदतीसाठी धावून आलेल्या अन्य कर्मचाऱ्यांनाही चक्कर येऊन तेही टाकीत पडले.

सर्वांना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या प्रकरणी मृतांचा अन्नांश (व्हिसेरा) तपासणीसाठी राखून ठेवण्यात आला असून ईश्वरपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या दुर्घटनेत कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक संरक्षण साधने उपलब्ध नव्हती का, याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

मृतांपैकी विशाल जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले व वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. सचिन चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, दोन अल्पवयीन मुले व आई असा परिवार आहे तर सागर माळी हा अविवाहित असून मृतांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

हेही वाचा: Nomination Forms Last Day : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांसाठी मोठी गर्दी; अंतिम मुदत आज दुपारी 3 वाजेपर्यंत.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा