ईश्वरपूर : नेर्ले (ता. वाळवा) येथे प्रेमविवाह केल्याच्या रागातून विवाहितेचे अपहरण झाल्याची गंभीर घटना गुरुवारी मध्यरात्री घडल्याची नोंद कासेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. या घटनेत पतीसह सासू आणि दिराला मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नम्रता युवराज माने (वय १९) आणि युवराज बाळासाहेब माने (वय ४०, रा. नेर्ले) यांनी तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. या विवाहाला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता, असे तक्रारीत नमूद आहे.
फिर्यादीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांमधून आलेल्या काही जणांनी माने यांच्या घरात प्रवेश केला. दरवाजा तोडून आत शिरल्यानंतर पती युवराज माने यांना काठ्या व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. आरडाओरड ऐकून मदतीसाठी धावून आलेल्या आई सुमन माने आणि भाऊ धनाजी माने यांनाही मारहाण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेनंतर नम्रता माने यांना जबरदस्तीने नेण्यात आल्याचा आरोप पतीने केला आहे. याप्रकरणी नम्रताचे वडील, आई यांच्यासह अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास सुरू आहे.
कासेगाव पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून, विवाहितेचा शोध घेण्यासाठी पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा: तासगावजवळ पिस्तूल विक्रीचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला; तरुणाकडून दोन पिस्तूले व जिवंत काडतूस जप्त.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










