मिरज : मिरज–पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर नागज फाट्याजवळ शुक्रवारी मध्यरात्री एक गंभीर प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. RTO अधिकारी असल्याचे भासवून एका स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या व्यक्तींनी धान्याची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना जबरदस्तीने अडवून कांद्याची पोती उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी तालुक्यातील काही शेतकरी आपली कांद्याची वाहतूक बेळगावकडे करत असताना रात्री सुमारे २ वाजता नागज फाट्याजवळ त्यांची गाडी अडवण्यात आली. स्कॉर्पिओ वाहनातील व्यक्तींनी आपण RTO अधिकारी असल्याचे सांगत वाहनाची कागदपत्रे तपासली. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्व कागदपत्रे व्यवस्थित असूनही “ट्रकमधील पाच कांद्याची पोती द्या, अन्यथा गाडी पोलीस ठाण्यात जमा करू” अशी धमकी देण्यात आली.
या घटनेत संबंधित व्यक्तींनी कांद्याची पोती आपल्या खासगी स्कॉर्पिओ वाहनात टाकून तेथून निघून गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. संबंधित स्कॉर्पिओ वाहनाच्या मागील बाजूस ‘पोलीस’ असे लिहिलेले असल्याचेही शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस नागेश चव्हाण यांनी केली आहे. महामार्गावर अशा प्रकारे अधिकारी असल्याचे भासवून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्यास ती गंभीर बाब असून संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी, असे त्यांनी म्हटले आहे.
या घटनेप्रकरणी अद्याप पोलीस किंवा प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, शेतकरी संघटनांकडून या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात असून, महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










