मिरज : मिरज–पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर नागज फाट्याजवळ शुक्रवारी मध्यरात्री एक गंभीर प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. RTO अधिकारी असल्याचे भासवून एका स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या व्यक्तींनी धान्याची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना जबरदस्तीने अडवून कांद्याची पोती उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी तालुक्यातील काही शेतकरी आपली कांद्याची वाहतूक बेळगावकडे करत असताना रात्री सुमारे २ वाजता नागज फाट्याजवळ त्यांची गाडी अडवण्यात आली. स्कॉर्पिओ वाहनातील व्यक्तींनी आपण RTO अधिकारी असल्याचे सांगत वाहनाची कागदपत्रे तपासली. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्व कागदपत्रे व्यवस्थित असूनही “ट्रकमधील पाच कांद्याची पोती द्या, अन्यथा गाडी पोलीस ठाण्यात जमा करू” अशी धमकी देण्यात आली.
या घटनेत संबंधित व्यक्तींनी कांद्याची पोती आपल्या खासगी स्कॉर्पिओ वाहनात टाकून तेथून निघून गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. संबंधित स्कॉर्पिओ वाहनाच्या मागील बाजूस ‘पोलीस’ असे लिहिलेले असल्याचेही शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस नागेश चव्हाण यांनी केली आहे. महामार्गावर अशा प्रकारे अधिकारी असल्याचे भासवून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्यास ती गंभीर बाब असून संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी, असे त्यांनी म्हटले आहे.
या घटनेप्रकरणी अद्याप पोलीस किंवा प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, शेतकरी संघटनांकडून या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात असून, महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










