मिरज : सांगली शहरालगतच्या माधवनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून त्याचे पडसाद स्थानिक निवडणूक मतदानावर उमटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
माधवनगरमध्ये सुमारे सलग पाच दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना गैरसोयींचा मोठा सामना करावा लागला. निवडणुकीच्या दिवशी सकाळी काही ठिकाणी पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाला असला तरी या कालावधीत झालेल्या त्रासाबद्दल स्थानिकांमधून असंतोष व्यक्त करण्यात येत होता.
“पाणीपुरवठा नियमित नसल्याने दैनंदिन कामांवर परिणाम झाला. प्रशासनाने याकडे वेळेत लक्ष द्यायला हवे होते,” अशी भावना काही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार, माधवनगरमध्ये दुपारपर्यंत मतदानाची टक्केवारी तुलनेने कमी राहिल्याचे सांगितले जाते. काही प्रभागांमध्ये मतदान सुमारे 45 टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिल्याचे सांगितले जाते, तर इतर भागांत सरासरी 52 ते 55 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.
दरम्यान, शेजारच्या बुधगाव, कवलापूर, बिसूर, कावजी खोतवाडी आणि वाजेगाव परिसरात मात्र मतदानासाठी नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद दिसून आला. संबंधित जिल्हा परिषद मतदारसंघात विविध पक्षांच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाल्याने निकालाबाबत उत्सुकता कायम आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडून नियमित व सुरळीत पाणी पुरवठ्याची अपेक्षा व्यक्त केली असून, या प्रश्नाचा निवडणुकीच्या निकालावर कितपत आणि काय परिणाम होतो याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेचा 28 वा वर्धापन दिन आज; मुख्यालयात सकाळी 10.30 वाजता दीपप्रज्वलन कार्यक्रम.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










