ईश्वरपूर : ऊसतोड मजूर पुरवण्याचे आमिष दाखवून ऊस वाहतूकदाराची सुमारे ८ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विजापूर जिल्ह्यातील एका मुकादमावर ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फसवणूक ऊस गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर झाल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमेश दिनू चव्हाण (वय 44, रा. कामेरी) हे ऊस वाहतूक व्यवसाय करतात. सन 2025–26 च्या ऊस गळीत हंगामासाठी विजापूर जिल्ह्यातील मोहन जयसिंह राठोड (रा. बाराकोटी तांडा, ता. विजापूर) या मुकादमाने त्यांना १२ ऊसतोड मजूर पुरवण्याचे आश्वासन दिले होते.
या आश्वासनावर विश्वास ठेवून चव्हाण यांनी १६ जून ते २८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ऊस हंगामासाठीची उचल म्हणून रोख व ऑनलाईन माध्यमातून एकूण ८ लाख ४५ हजार रुपये दिले. मात्र, ऊस हंगाम सुरू होऊनही मजूर उपलब्ध करून दिले गेले नाहीत.
पैसे परत मागितल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रमेश चव्हाण यांनी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी मोहन जयसिंह राठोड याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










