ईश्वरपूरजवळ सेप्टिक टँक साफसफाईदरम्यान भीषण दुर्घटना; तिघांचा मृत्यू, पाच जखमी

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
फोटो : फाईल फोटो (प्रातिनिधिक)

ईश्वरपूर (ता. वाळवा) : वाळवा तालुक्यातील पेठ परिसरात पुणे–बंगळुरू महामार्गालगत असलेल्या एका कंपनीत सेप्टिक टँकची साफसफाई करताना विषारी वायूमुळे गुदमरून तिघा कामगारांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी (दि. 28 डिसेंबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

मृत कामगारांची नावे विशाल सुभाष जाधव (26, रा. बेघर वसाहत, ईश्वरपूर), सचिन तानाजी चव्हाण (39, रा. बेघर वसाहत, ईश्वरपूर) आणि सागर रंगराव माळी (33, रा. गोळेवाडी, पेठ) अशी आहेत. जखमींमध्ये विशाल मारुती चौगुले (24), केशव आनंदा साळुंखे (45), हेमंत शंकर धनवडे (27) आणि सुनील आनंदा पवार (29) यांचा समावेश असून त्यांच्यावर ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महादेव रामचंद्र कदम (40) यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीतील ड्रेनेज आणि सेप्टिक टँकची साफसफाई सुरू असताना विशाल जाधव हा अचानक टँकमध्ये पडला. त्याला वाचवण्यासाठी सागर माळी आणि सचिन चव्हाण हे तातडीने टँकमध्ये उतरले. मात्र, टँकमध्ये साचलेल्या विषारी वायूमुळे आणि प्राणवायूच्या कमतरतेमुळे तिघेही गुदमरले. त्यांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

तिघांना वाचवण्याच्या प्रयत्नात इतर पाच कामगारही टँकमध्ये उतरले होते. त्यांनाही विषारी वायूचा फटका बसल्याने त्यांची प्रकृती खालावली. सर्व जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेमुळे पेठ, ईश्वरपूर आणि आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, सेप्टिक टँक साफसफाईदरम्यान सुरक्षात्मक उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. ईश्वरपूर पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

हेही वाचा: सांगली मॅरेथॉनमधून मतदान जनजागृती; ३,००० हून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा