तासगाव : आरवडे (ता. तासगाव) येथे शेतात वैरण काढण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना समोर आली असून या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी ही चोरी केल्याची माहिती आहे.
याप्रकरणी कविता केशव चव्हाण (वय 48, रा. आरवडे) यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता चव्हाण या आरवडे–मांजर्डे रस्त्यालगत असलेल्या शेतात वैरण काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्यांना भीती दाखवून गळ्यातील सुमारे 50 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले.
क्षणातच दोघेही दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले. ही घटना सोमवार, दि. 2 डिसेंबर रोजी दुपारी घडली होती. मात्र, चोरट्यांनी दाखविलेल्या भीतीमुळे धास्तावलेल्या कवितांनी दहा दिवसांनंतर पोलिसांत तक्रार दिल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
तासगाव पोलिस ठाण्यात सदर घटनेची नोंद करण्यात आली असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आरवडे परिसरात विशेषतः महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
हेही वाचा: ईश्वरपूरात लॉजवर सुरू असलेला कुंटणखाना उद्ध्वस्त; व्यवस्थापकासह तीन जण अटकेत, परराज्यातील युवतीची सुटका.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










