मिरज : मिरज तालुक्यातील एरंडोली येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. आठवडा बाजार आटोपून घरी परतत असताना झालेल्या या अपघातामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
इलाही हबीब इनामदार आणि संजय रघुनाथ कदम (दोघे रा. हनुमाननगर, एरंडोली, ता. मिरज) अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास दोघे दुचाकीवरून घरी परतत असताना एरंडोली येथील हनुमान हॉटेलजवळ पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी जोरदार होती की दुचाकी पूर्णपणे चक्काचूर झाली. या अपघातात इलाही इनामदार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या संजय कदम यांना तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नेण्यात येत होते. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचाही मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या मार्गावर वाहतूक नियंत्रण व रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
हेही वाचा: आज महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता, राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










